पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश   

मुंबई,  (प्रतिनिधी) :राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पीकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश सर्व विभागीय आयुक्त तसेच  जिहाधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी गुरुवारी दिली.
 
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांप्रति  राज्य सरकार  संवेदनशील आहे. एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल  आणि कृषी  विभागाने पथके स्थापन करून ही कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे  जाधव-पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा आणि  गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यास राज्य सरकार नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकर्‍यांना ४ हजार ८३३ कोटी, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च  २०२५ या कालावधीत ६९ लाख ३ हजार शेतकर्‍यांना ६ हजार ९८९ कोटी, तर  १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५  या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकर्‍यांना ९७५ कोटींची मदत देण्यात आली.

Related Articles